‘दस मिनिट पहले भाई से फोन पे बात हुई और अगले दस मिनिट में सब खतम..!’
(मृत मोहंमद सोहेलचा भाऊ सांगत होता)
तू इस काम पे मत आ; बहुत समझाया पर वह आया और हमेशा के लिए चला गया..!
(मृत तहजीब आलमचा भाऊ सांगत होता)
——————————-
प्रसंग : १ ला
“मोहंमद… माझा छोटा भाऊ… पोटापाण्यासाठी पुण्यात आला होता. दुर्घटनेच्या आदल्याच दिवशी तो पुण्यात आला आणि त्याच्या कामाचा पहिलाच दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. त्या काळरात्री दुर्घटना घडण्यापूर्वी दहा मिनिटं अगोदर मी त्याच्याशी बोललो होतो. तेव्हा दहा मिनिटांत काम संपेल, असं तो म्हणाला पण पुढल्या दहाच मिनिटांत ही दुर्घटना घडली आणि सगळं काही संपलं…” या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मोहंमद सोहेलचा भाऊ हे सांगताना ढसाढसा रडत होता.
प्रसंग : २ रा
“या साईटवर काम करण्यासाठी येऊ नको म्हणून मी त्याला अनेकदा सांगितलं होतं पण त्यानं ऐकलं नाही. तो आला आणि ज्या दिवशी काम सुरू केलं त्याच दिवशी ही दुर्घटना घडली. लहान भाऊ असल्यानं दिवसभरात दोन ते तीन वेळेस आमचं फोनवर बोलणं व्हायचं. गुरुवारी दुपारीही आम्ही फोनवर बोललो होतो. घरून देखील आम्हाला दररोज फोन यायचे पण आता तो आमच्यात नाही…” या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तहजीब आलमच्या भावाला हे सांगताना अश्रू अनावर झाले होते.
————————-
हे काय पाहतोय आपण..? माणसाच्या जिवापेक्षा लोखंडाला जास्त किंमत कधीपासून द्यायला लागला माणूस ? का आपलं हृदय देखील त्या लोखंडासारखं निबर बनलंय ? भावनाशून्य झालंय ? पैसा, संपत्ती केवळ हीच असते का हो कमाई ? का चार पैसे जास्त मिळतील म्हणून माणुसकीसुद्धा त्या लोखंडासारखी भंगाराच्या दुकानात विकून आलोय आपण सारेजण ? पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरातल्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून जी जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण ? तुम्ही-आम्ही, ढिम्म प्रशासन, भ्रष्टाचारानं काबीज केलेली व्यवस्था की, मुर्दाड बनत चाललेली माणुसकी ! या दुर्घटनेत पाच कामगारांचा हकनाक जीव गेला तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले.
या कामगारांच्या जिवाला काही किंमतच नव्हती का ?
इमारतीच्या स्लॅबसाठी 1000 टनांहून अधिक वजनाची महाकाय लोखंडी जाळी तयार केली जात असताना आणि विशेषतः रात्रीच्या वेळी हे काम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणं महत्त्वाचं वाटलं नव्हतं का ? का या बांधकाम प्रकल्पाचे मालक, विकसक, आर्किटेक्ट, साइट इंजिनिअर, कंत्राटदार यांच्या लेखी कामगारांच्या जिवाला काही किंमतच नव्हती का ? अहो, साधा काटा जरी पायात रुतला तरी असह्य वेदना होतात मग इथं तर या कामगारांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्या होत्या; त्यांना किती वेदना झाल्या असतील ? कुणी तरी आपल्याला वाचवेल या आशेनं जिवाच्या आकांतानं ओरडत मृत्यूपूर्वी ते किती तडफडले असतील ?
सुरक्षा नियमांचे तीन तेरा वाजवणाऱ्यांचे कधी वाजणार बारा ?
ही दुर्घटना पाहून अग्निशमन दलाचे जवान, पोलीस-पालिका कर्मचारी आदी प्रत्यक्षदर्शींचं हृदय तर पिळवटून निघालं असेल पण टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून या घटनास्थळाची दृश्यं पाहणारी तुमच्या आमच्या सारखी सर्वसामान्य माणसं देखील काही काळ सुन्न झाली असतील. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या एका नातेवाइकाच्या म्हणण्यानुसार, ‘घटनास्थळी सुरक्षिततेची कोणतीही साधनं नव्हती, इंजिनिअर देखील नव्हता. चुकीच्या पद्धतीनं काम सुरू होतं. निव्वळ राहिलेलं स्टील वाचवण्यासाठी आमच्या माणसांचा जीव घेतला.’ या नातेवाईकाचं हे म्हणणं लक्षात घेता कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता सुरक्षेच्या नियमांचे तीन तेरा वाजवणाऱ्यांचे आता बारा वाजवलेच पाहिजेत, हे नक्की !
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी