मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितले.